यवतमाळ (प्रतिनिधी )
सरकारने कर्जमाफी जाहीर केली. सोबत अटीशर्थीही टाकल्या. परिणामी, जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीत अपात्र ठरत असल्याचा आरोप करीत बोथबोडन (जि.यवतमाळ) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांनी आज (शनिवार) मुख्यमंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. सरसकट कर्जमाफी लागू करावी अशी मागणी शेतकरी विधवा महिलांनी केली.राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बोथबोडन येथे झाल्या आहेत. त्यानंतर अनेक राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी गावाला भेट दिली. त्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुलगांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आर्ट ऑफ लिव्हींगचे श्रीश्री रविशंकर, तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मनीशंकर अय्यर आदी नेत्यांचा समावेश आहे. नेत्यांच्या भेटीमुळे हे गाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. या ठिकाणी आज (ता.एक) सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या आदेशात अनेक अटी आहे. परिणामी शेतकरी अपात्र ठरत आहे. त्यामुळे या अटीशिथील करण्यासोबतच सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांची आहे. या मागणीसाठी शेतकरी महिलांनीच तिरडीउचलली. गावातील मुख्यठिकाणाहून अंत्ययात्रा स्मशानभुमीत पोहोचली या ठिकाणी कौशिक मेटकर महिलेनी भडाग्नी दिला.यावेळी शांताबाई वरणकार, लाजीबाई राठोड, अनसूया देवकर, चंद्रकला शेळके, लीलाबाई पुरी, सुंदरी चव्हाण, कौशिक मेटकर या महिलेसह अनुप चव्हाण, रोहित राठोड, जितेंद्र राठोड, दत्ता राठोड, श्याम राठोड यांच्यासह गावातील नागरिक, महिला उपस्थित होते.
टिप्पण्या