(विशेष प्रतिनिधी) :
रात्रशाळांच्या प्रश्नांवर आणि मुंबईतील शिक्षकांचे पगार मुंबई जिल्हा बँकेतून करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारकडे रदबदली करण्याचे मान्य केले आहे. जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी आज थेट दिल्लीत या प्रकरणी जावडेकरांना साकडं घातलं आणि हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यावेळी जावडेकरांनी हे आश्वासन दिलं.
मुंबईत शिक्षकांचे राष्ट्रीयकृत बँकेमार्फत गेली सहा वर्षे नियमित व सुरक्षित पगार होत होते. मात्र शिक्षण विभागाने अचानकपणे आधीच वादग्रस्त ठरलेल्या मुंबई जिल्हा बँकेतून पगार करण्याचा जीआर काढला आहे. हा निर्णय वादात सापडला असून शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सुरळीत व सुरक्षित असलेले पगार मुंबई बँकेत नेण्याचे कारण काय? या प्रश्नाकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. या बँकेत ४१२ कोटींचा घोटाळा झाला असून संचालकांवर कारवाई करण्याची मागणी खुद्द विनोद तावडे यांनीच विरोधी पक्ष नेता असताना केली होती. या प्रकरणी आपण तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू असं आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिलं.
रात्रशाळांच्या संबंधातल्या शासन निर्णयाला हायकोर्टाने मान्यता दिली असली तरी त्याची अंमलबजावणी नव्या नियुक्त्यांच्या संदर्भात करायला हवी. आहेत त्या कार्यरत शिक्षकांना काढण्याची गरज नाही. हे शिक्षक अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने शिकवताहेत. एकटे कमावते आहेत. डोक्यावर कर्ज आहे. मुलींची लग्न होऊ घातली आहेत. या स्थितीत त्यांना संरक्षण देणं आवश्यक आहे, असा आग्रह शिष्टमंडळाने धरला. तेव्हा याबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करु, असं जावडेकरांनी सांगितलं.
राज्यातील अनेक जिल्हा बँका बुडल्यामुळे तेथील शिक्षकांचे पगार व ठेवी बुडाल्या आहेत. आजतागायत त्या मिळालेल्या नाहीत. आधीच अडचणीत असलेल्या मुंबई जिल्हा बँकेवर शिक्षकांचा विश्वास नाही. त्यामुळे या बँकेत खाती उघडण्यास शिक्षक नकार देत आहेत. त्यांच्या असंतोषाची दखल आपण घ्यावी असं आवाहन जालिंदर सरोदे आणि सुभाष मोरे यांनी केलं. मुुंबई बँकेच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करत आपण तातडीने मुख्यमंत्र्यांकडे तुमच्या भावना पोचवू असं जावडेकरांनी सांगितलं.
*फिजीकल एज्युकेशनवर भर*
आरटीईमधील तरतूदींमुळे कला-क्रीडा शिक्षकांवर कुऱ्हाड आली आहे. या दोन्ही विषयांना महत्व दिले गेले पाहिजे, असे अशोक बेलसरे यांनी निदर्शनास आणून दिले तेव्हा याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जावडेकर यांनी दिले. डिजीटल एज्युकेशन, फिजीकल एज्युकेशन आणि व्हॅल्यू एज्युकेशन या तिन्ही गोष्टींवर केंद्र सरकारच्या नव्या धोरणात भर राहिल अशी नवी बातमीही जावडेकर यांनी सांगितली.
टिप्पण्या