शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड अभियानाचा रेवलीत शुभारंभ_
परळी दि. 01 ------ जलयुक्त शिवार योजना यशस्वी केल्यानंतर आता शासनाने वनयुक्त शिवार करण्यासाठी राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्याची विशेष मोहिम सुरू केली असून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.
शासनाच्या वन विभागाने 1 ते 7 जूलै दरम्यान आयोजित केलेल्या चार कोटी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील रेवली शिवारातील फाॅरेस्ट क्रमांक 08 येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी सदस्य वृक्षराज निर्मळ तर प्रमुख पाहुणे म्हणून बाल हक्क आयोगाच्या सदस्या डाॅ. शालिनी कराड, ज्येष्ठ नेते भीमराव मुंडे, रामेश्वर मुंडे, पं. स. सदस्य भरत सोनवणे, रेशीमनाना कावळे, हनुमंत नागरगोजे, प्रा. बिभीषण फड, चंद्रकांत देवकते, वनाधिकारी सातपुते, वन क्षेत्र अधिकारी शिंदे, मलनाथपूरचे सरपंच गोविंद खडके आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना यशस्वी केली पण केवळ शिवारं जलयुक्त करून भागणार नाही तर वनयुक्त झाली पाहिजेत. वृक्ष लागवड करून झाडांचे संगोपन केले तर पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत होईल. जलयुक्त मधून रेवली परिसरातील 140 हेक्टर क्षेत्रात माती नाला बंधाऱ्याचे काम झाल्याने या भागातील विहिरी, तलावात पाणी आले. तसेच काम यात झाले पाहिजे. मराठवाडय़ात वनक्षेत्र कमी आहे, मागील वर्षी एक कोटी व आता चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे, त्यादृष्टीने सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन ही मोहिम यशस्वी करावी असे आवाहन करून ना. पंकजाताई मुंडे यांनी ही मोहिम राबविल्या बद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आपल्या भाषणात कौतुक केले.
यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वेगवेगळ्या वृक्षांची लागवड परिसरात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी संजय केंद्रे यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
*वैद्यनाथ कारखाना येथे वृक्षारोपण*
--------------------------------------------
चार कोटी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ वैद्यनाथ साखर कारखाना येथे ही करण्यात आला. कारखान्याच्या अध्यक्षा तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते कारखाना परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. कारखान्याचे संचालक मंडळाने श्रीहरी मुंडे, भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, कार्यकारी संचालक दगडे आदी यावेळी उपस्थित होते.
■■■■
टिप्पण्या