मुंबई : भाजपने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता भाजपचे मित्रपक्षही त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे. या संदर्भात उद्या (मंगळवार) हे सर्वजण भूमिका स्पष्ट करणार असून, या सर्वांना आता इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.भाजपवर मित्र पक्ष नाराज असून, भाजपने आतापर्यंत सत्ता स्थापनेच्या खेळात आपल्याला कुठेही बोलविले नाही. याची नाराजी या पक्षांमध्ये आहे. भाजपने मित्रपक्षांसोबत निवडणुका लढल्या असल्या तरी सत्तेत न जाण्याचा निर्णय फक्त भाजप नेत्यांच्या बैठकीतच घेतला. कुठल्याही बैठकीला बोलावलं नाही, सत्ता स्थापन करणार नाही, या बाबत कोणतीही कल्पना भाजपने दिली नाही, अशी या मित्रपक्षांची भूमिका आहे.भाजपसोबत राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत शेतकरी संघटना, आरपीआय आठवले गट या मित्रपक्षांनी 164 जागांवर निवडणूक लढविली होती. या सर्वांना मिळून 105 जागा मिळाल्या होत्या. आता शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी फारकत घेतल्यानंतर भाजप विरोधात बसणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या मित्रपक्षांना काय मिळणार हाही प्रश्न आहे. आम्हाला विचारात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते, अशी यांची भूमिका आहे. सध्या सदाभाऊ खोत, महादेव जानकर मोबाईल बंद आहेत, तर विनायक मेटे उद्या माध्यमांसमोर बोलणार आहेत.

टिप्पण्या